भुसावळ | महाराष्ट्र न्यूज वाले प्रतिनिधी:
येथील तापी नदीच्या पात्रात एका अज्ञात युवकाचा मृतदेह गुरुवारी 18 डिसेंबररोजी दुपारी आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृत्यू घातपात आहे की आत्महत्या, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विवरा खुर्द येथील हितेश सुनील पाटील (वय २१) हा युवक जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. ४ ते ५ दिवसांपासून तो घरातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. तर, १४ रोजी हितेश पाटील याची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळली होती. यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, १७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती कळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह हितेश पाटील याचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, हितेश पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधार कोण आहे ? कुणी हत्या केली? याचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. याच मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून जवळपास दीड तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी विवरा येथील ग्रामस्थ बहुसंख्येने पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. दरम्यान, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो. नि. विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईक व जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास २ तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात विवरा येथे हितेश पाटील या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून ही आत्महत्या की हत्या, याबाबतचे सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तपासाची चक्रे सुरू:
मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असून त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. मृतदेहावर कोणत्याही जखमांच्या खुणा आहेत का, याचा तपास वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.
परिसरात भीतीचे वातावरण:
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच, आता नदीत संशयास्पद मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.

Leave a Reply